'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या कथेविषयीचं, आपलं आकलन मात्र वाढलं नाही, असंच खेदाने म्हणावं लागतं. वर्षानुवर्ष तीच कथा आपण सांगत आलो किंवा ऐकत आलो. त्यात काडीचाही बदल नाही. एवढी वैचारिक स्थितीप्रियता, आमच्या अंगी आली आहे. विचारच करायचा नाही असा प्रण केल्यावर, वय वाढलं तरी बुद्धीत वाढ कशी होणार! परिणामी हजारवेळा ऐकूनही त्या कथेतल्या विसंगती, आपल्याला कळल्या नाहीत. असो! आपण डोळ्यावर कातडं ओढलं, म्हणून सगळ्या जगाने डोळ्यावर कातडं ओढलं, असं होत नाही. जगात काही शहाणी माणसंसुद्धा असतात. ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. त्यामुळे त्यांना सत्याचा साक्षात्कार होतो. महात्मा जोतिबा फुले हे असेच सत्यशोधक सुधारक. सत्यशोधकीय दृष्टिमुळे बळीराजाच्या कथेतल्या विसंगती त्यांच्या सहज लक्षात आल्या.