प्रिय आईस, साष्टांग नमस्कार, लिहायला कुठून सुरुवात करू काहीच उमगत नाही, कारण अचानक वळवाचा पाऊस यावा आणि दारातल्या आंब्याचा मोहर सगळा गळून पडावा अगदी तशीच माझी अवस्था आहे बग. माहिती आहे मला तुझा स्पर्श आता होणे नाही कधीच, पण तुझ्यातल्याचं काही अंशांनी मी सुद्धा बनलोय ग.....😢 तुझं जाणं खरंच इतकं गरजेचं होतं का....? कस्तुरीचा गंध जसा अचानक लुप्त होतो आणि मग हरीण वेडपीस होतं अगदी तसंच तुझं लेकरू सुद्धा कावरं-बावरं झालंय ग.... कुठल्यातरी अंधाऱ्या गुहेत मला सोडून गेलीस तू...लावून एक छोटीशी पणती.…. आत्ताशी कुठंतरी पाऊलं टाकत होतो मी....पर चालता चालता तूच आठवायचीस. माझ्या नाजूक हातांना धरून तूच तर मला चालायला शिकवलंस खरं... तुझ्या कितीतरी आठवणींचा आता बाजार भरतो माझ्या मनाच्या कप्प्यात आणि त्या बाजारात मी हरवून जातो. कधी कधी मी एकटाच हसत बसतो मुश्कीलपणे तुझ्या आठवणींच्या झुल्यावर आणि तू पाठीमागून मला हेलकावे देतेस , सगळं आभाळ फिरून आल्याचा भास होतो बग...पण तुझ्याविना सगळं शुन्य आहे हे कळलं आहे मला. त्याच शून्यापासून सुरुवात करायचं म्हणतोय पुन्हा एकदा..माझ्या सगळ्या चुका पोटात घेऊन मला माफ करशील काय....? कधी चुकून वेडं वाकड बोललो असलो त्यासाठी तुझा आशिर्वाद राहू दे ग माझ्या पाठीशी त्याच्याशिवाय मी आधा-अधुराचं आहे. मनात तुझ्या आठवणीच ढग काळवंडल होतं. ते केव्हा ना केव्हा तरी बरसणारच होतं, मन मोकळं करावस वाटलं म्हणूनचं तर हा लेखन प्रपंच केला मी....कुणाच्यापाशी मोकळं करावं मन सुचतंच नव्हतं म्हणून तुलाच पत्रं लिहिलं बग. पत्रं मिळालं की परत मलासुद्धा पत्र कर तुझ्या पत्राच्या प्रतिक्षेत आहे मी..... कळावे, तुझाच बारक्या ##आईस पत्र##