‘‘उठा, उठा.. दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’
हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोसळेल ही भीती...दिवाळी बदलाच वारं निसर्गानेही मनावर घेतलेलं दिसतंय.....चार दिवसांवर दिवाळी आली तरी आपल्या मुलांच्या परीक्षा आत्ता कुठे संपत आहेत. सगळ्या बायकांची तर त्रेधातिरपीठ उडत असेल. मुलांचं वेळापत्रक सांभाळू की घराची साफसफाई की एकीकडे भाजणी च पाहू...... त्या शिवाय पैपाहुणे, खरेदी, दररोजचा स्वयंपाक अबब...यादी न संपण्याजोगी आहे.
सण साजरे करायचे म्हटले की त्याची जबाबदारी सगळ्यांनी उचल्यावर एकाच व्यक्तीवर त्याचा भार पडत नाही.अख्ख्या कुटुंबाने त्यातला आनंद घेण्याचा प्रयत्न करावा अस वाटतं.
माझ्या लहानपणी मला आठवत दिवाळी आली की आम्ही सर्व एकत्र येऊन कामे वाटून घ्यायचो. तस म्हटलं तर चाळीतील छोटसं घरं...... घर साफसफाई करताना आई स्वयंपाकघर, पप्पा बाहेरच सगळंच आवरायचे आणि आम्ही भावंडे आपापले अभ्यासाचे कप्पे साफ करून बाकीच्या कामात मदत करायचो. कुठे भांडी लावायला तर इथून सामान तिथे नेऊन दे, तर उन्हात टाकलेल्या गादयांचा कापूस पिंजायला, माळ्यावरच सामान खाली उतरवायला अस कितीतरी.....साफसफाई नंतर फराळ बनवायला ही एकत्र बसण्यात मज्जा होती. चाळ म्हटल्यावर शेजारधर्म आलाच..... सगळे एकमेकांकडे जाऊन फराळ करायला मदत करायचे. चाळीतली मुले पहाटेपर्यंत जागून कंदील बनवायचेत. तरीही सकाळी उठून पहिला फटाका कोण फोडेल ह्यावर पैंजही लावायचो. चाळीच्या गॅलरीत टांगलेले कंदील.. आणि एकापाठोपाठ एक प्रकाशमान होणाऱ्या खोल्या. आई उटणं लावून न्हाऊ घालायची मग पायाने कारेट फोडून दिवाळीला नवीन आणलेले कपडे घालून एकत्र फराळ करायचो. आवाज, दीपावली, मौज अश्या कुठल्या दिवाळी अंकात काय काय साहित्य छापून आलंय ह्याची उत्सुकता असायची. दिवाळीत आमच्या चाळीत सत्यनारायणाची पूजा असल्याने चाळीत चैतन्य असायचं. मग निरनिराळ्या स्पर्धा, डान्स, क्रीडा शैक्षणिक बक्षिसांचा वर्षाव असायचा... दिवाळी म्हणजे मग वाटायचं खूप धमाल आणि मस्ती.....
#story#nojotophoto