गीता आणि जयेश दोघेही समवयस्क,सक्खे शेजारी आणि दोघांची मैत्री अगदी लहानपणापासूनच,म्हणजे कोणीही त्यांच्या मैत्रीकडे पाहून लोकांना त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देत असत.इतकी निखळ मैत्री. गीता आणि जयेश दोघेही त्यांच्या आईवडिलांचे खूप लाडके आणि एकुलते एक होते. गीताचे प्रवीणशी नुकतेच लग्न ठरले होते.आणि जयेश ने तीच्या लग्नाची जबाबदारी अगदी मोठया भावाप्रमाणे घेतली होती.गीताला तो अगदी लग्नाच्या साडया निवडण्यापासून दागिने निवडे पर्यंत प्रत्येक गोष्टीत तो मदत करत होता. मेहेंदी वाली,पार्लर वाली सगळेच त्याने ठरवले होते.गीताचे तर जयेशची मदत घेतल्याशिवाय पानच हालत नसे. प्रवीणचे स्वागत तर जयेश ने अगदी जंगी केले.त्याच्या पाहुणचारात कसलीही कसर सोडली नाही.गीताच्या आईवडिलांनाही जयेशचा खूप मोठा आधार वाटत होता.आणि जयेशच्या आईवडिलांना त्याचा अभिमान. गीता आणि प्रवीण चे लग्न एकदम थाटामाटात पार पडले. पाठवणी च्या वेळी गीता आणि जयेश अगदी दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले.ते बघून प्रवीणच्या घरच्यांची कुजबुज सुरु झाली. असं कुठे असते का? खूप मित्र मैत्रिणी पाहीले पण इतके गळाभेट करने शोभते का? ते पण सर्वांसमोर वगैरे वगैरे. गीता आणि प्रवीणने नाही पण त्यांच्या आईवडिलांनी मात्र ती कुजबुज ऐकली.त्यानी देखील इतक्या वर्षात कधीच गीता आणि जयेश च्या मैत्रीला कधी चुकूनही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहीले नव्हते. गीता आता आपल्या नवीन घरी आली. तीचे तिथे छान स्वागत झाले.गीताचा स्वभाव खूप प्रेमळ असल्याने काही दिवसातच तिने त्या घराला आपलेसे केले.घरातील सगळी कामे ती आनंदाने करायची.नाव ठेवायला जागा नव्हती.प्रवीणही गीतावर खूप प्रेम करायचा.