बळीराजा तु धीर सोडू नकोस! अंधारयात्रेचा प्रवासी तु, चाचपडत का होईना चालत रहा. दारिद्रयाचा काळोख मिटविण्या, तेजोमय पहाट लवकरच उजाडेल; या धीरोदात्त शब्दांनी स्वतः ला सावरत रहा. जगाचा पोशिंदा ही बिरुदावली मिरविणारा लढवय्या तु. असंख्य आस्मानी आणि अनैसर्गिक संकटांना विजयी मुद्रेने भिडणारा तु. कित्येक आत्म्यांची पोटाची खळगी भरणारा तु. असा आत्महत्येचा विचारच कसा करू शकतो? मान्य, संघर्ष हा तुझ्या पाचवीलाच पुजलेला पाहुणा. परंतु, तु हे ही विसरू नकोस तुझ्यात क्षमता आहे ती संघर्षाला भिडण्याची, असंख्य वादळे पेलण्याची अन नवोन्मेषीवृत्तीने पुन्हा सावरण्याची. तुझ्या जाण्याने एका घराचं छप्पर मात्र उडून जाईल. जेंच्यासाठी तु मायेची सावली होता; त्यांचे भावविश्व भर उन्हात करपून जाईल. वाईट दिवसांचे हे सावट आले तसे निघून जाईल. तुझे दुःख पाहून ढग पुन्हा गहिवरून येतील. आनंदाचे क्षण पुन्हा अंकुरतील. फक्त बळीराजा तु धीर सोडू नकोस. -सोमचंद्र बळीराजा, तु धीर सोडू नकोस!